मुंबई : शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाही तर इतर राज्याचेही शेतकरी आहेत, असं सांगतानाच आंदोलनातील शेतकरी हिंदू नाहीत का? असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
नवी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच टीका सुरू केली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संतापले आहेत. नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं गेले.
ट्रॅक्टर आंदोलनात घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोनल चिघळवण्याचा प्रयत्न केला. आता भाजप धर्माचा आधार घेऊन आंदोलन करत असून हे चुकीचं आहे.
दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी हिंदू नाहीत का? असा सवालही त्यांनी केला. बजेटमध्ये दीडपट हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली.
शेतकरी हमी भावाची मागणी करत आहेत. तुम्ही त्यांना लेखी का लिहून देत नाही, असं सांगतानाच दिल्लीतील आंदोलनात केवळ पंजाबचेच शेतकरी नाहीत.
या आंदोलनात इतर राज्यांचेही शेतकरी आहेत. त्यामुळे केवळ हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित असल्याचं चित्रं उभं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
शिवसेना नेते संजय राऊत आज गाझीपूरला जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेत ठरल्यानुसार ते जात आहेत. या आंदोलनाला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला आहे, असंही त्यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा अधिकार
यावेळी त्यांनी वीज वितरणावरही भाष्य केलं. खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा अधिकार आहे. वीज दर निश्चित करण्याचा अधिकार सरकारचा नाही. एमआरसी वीज दरवाढीचा निर्णय घेत असते. त्याबद्दल जास्त काही बोलता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.