मनातून काँग्रेस ‘संभाजीनगर’ नावाला सकारात्मक आहे | संजय राऊत यांचा दावा

157

मुंबई : औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा वाद सध्या गाजत आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा नामांतरास ‘विरोध’ आहे.

कॉंग्रेस नेते या विषयावर जाहीर भूमिका मांडत असले तरी शिवेसना व संजय राऊत यांना मात्र कॉंग्रेसची मौन संमती आहे असे वाटत असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे. औरंगाबादच्या नामांतरावर आक्रमक झालेल्या भाजपला राऊत यांनी खडे बोल सुनावले. 

‘बिहारमध्येही औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. त्याचंही नामांतर करावं अशी मागणी आहे. भाजपनं यावर भूमिका स्पष्ट करावी, असंही त्यांनी सांगितलं.

मनातून काँग्रेस ‘संभाजीनगर’ नावाला सकारात्मक आहे, असा दावा त्यांनी केला आहे.  

नाशिकचे माजी आमदार वसंत गिते व भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

औरंगाबादचा मुद्द्यावर त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. त्यात काँग्रेसच्या विरोधाचाही मुद्दा होता. मात्र, काँग्रेस मनातून सकारात्मक आहे, असं ते म्हणाले.

नामांतर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसला तरी लोकभावनेचा आदर करून एखादा निर्णय घ्यायचा नाही असं नाही,’ असंही राऊत म्हणाले.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘माझ्यावर कोणताही घाव, वार वा हल्ल्याचा परिणाम होत नाही.

नोटिसा म्हणजे सरकारी कागद असतो. त्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल हे ईडी आणि सीबीआय आमच्या मागे लावणाऱ्यांनी लक्षात ठेवावं.’

विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातील निवडून द्यावयाच्या १२ जागा रिक्त आहेत. त्या जागांसाठी राज्यातील महाविकास आघाडीनं सरकारनं उमेदवारांची शिफारस केली आहे.

मात्र राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचारलं असता, ‘मंत्रिमंडळानं शिफारस केल्यानंतरही सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे. राज्यपालांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here