मुंबई: काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाचीही मागणी केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची निवड तूर्तास ‘होल्डवर’ ठेवली आहे.
नाना पटोले यांची अवास्तव मागणी पाहून हायकमांडनी निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे.
काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाचा भार काढून तो नाना पटोले यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला होता.
नाना पटोले यांच्या नेतृत्वात पक्षाला बळकटी मिळेल, पक्ष वाढले ही अपेक्षा होती.
पक्षाला भरपूर वेळ देऊ शकेल या हेतूने पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार होती.
बाळासाहेब थोरात हे विधानसभेतील पक्षाचे गट नेते आहेत.
राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
थोरात यांच्यावर तीन तीन जबाबदाऱ्या असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाला न्याय देऊ शकत नसल्याची हायकमांडची भावना होती.
त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीने पक्षाचा वेगाने पक्षविस्तार करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे पक्षाला पूर्णवेळ कार्यक्षम व आक्रमक अध्यक्ष देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या होत्या.
पटोलेंची भलतीच मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शिक्कामोर्तब केलं होते.
त्यांच्या नियुक्तीपत्रावर सोनिया गांधी यांनी सहीही केली आहे.
मात्र पटोले यांनी ऐनवेळी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची मागणी केली आहे.
ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रिपद देण्याची मागणी पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी ऐनवेळी केलेल्या या मागणीवर सोनिया गांधीही आश्चर्यचकीत झाल्या आहेत.
त्यामुळे त्यांनी पटोले यांची ‘अवास्तव’ मागणी धुडकावून लावली आहे.
आता निवड ‘होल्डवर’ ठेवून नवीन चेहरा शोधला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड रखडली गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू
काही सूत्रांच्या मते, काँग्रेस हायकमांड यांना आपल्या पदाला न्याय देणारा प्रदेशाध्यक्ष हवा आहे.
मित्र पक्षाच्या दबावाला झुगारून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी योग्यरितीने पार पाडेल असा ‘नवा प्रदेशाध्यक्ष’ हवा आहे.
इतर कोणतीही जबाबदारी न घेता फक्त प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी पार पाडेल, अशा प्रदेशाध्यक्षाची केंद्रीय नेत्यांना गरज आहे.
मात्र, पटोले यांनी पक्षाची अडचण ओळखून कोंडी करीत त्यांनी आणखी एक मागणी वाढवली.
त्याचा हायकमांडलाही आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी नापसंती व्यक्त केली, असेही सूत्रांनी सांगितले.
आता नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पाटील यांनीही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे.
पक्षाच्या प्रत्येक आमदाराशी वन-टू-वन चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यास पाटील यांनी सुरुवात केली आहे.
नाना पटोले यांच्या मागणीने नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली आहे.