मुंबई : कोरोनाच्या प्रकोपात आशादायक दिलासा मिळाला आहे. राज्यातील करोना रुग्णसंख्येत हळूहळू घट होऊ लागली आहे.
काल दिवसभरात ३४,८४८ नवे रुग्ण आढळले तर ९६० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी झाली.
रुग्णसंख्या कमी होत असतानाच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. राज्यात सध्या ४ लाख ९४ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.
दिवसभरात ५९ हजार रुग्ण करोनामुक्त झाले. गत महिन्याच्या तुलनेत परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे आरोग्य खात्याचे सांगितले आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई १४४७, ठाणे ३१०, पुणे शहर १७८२, उर्वरित पुणे जिल्हा २६९४, पिंपरी-चिंचवड ८९५, नगर जिल्हा २९१७, नाशिक शहर ९२१, उर्वरित नाशिक जिल्हा १०३५, सोलापूर २३९१, सातारा १६५५, कोल्हापूर १५७९, नागपूर शहर ८११, चंद्रपूर जिल्हा ९७८ याप्रमाणे नवे रुग्ण आढळले.
मृतांमध्ये मुंबई ६२, कल्याण-डोंबिवली ४२, नगर २९, जळगाव २४, सोलापूर ९१, रत्नागिरी २८, सिंधुदुर्ग २१, बीड ३५, नागपूर विभाग १४४ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २१३ दिवस
मुंबई शहरात शनिवारी १ हजार ४४७ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधीही २१३ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे.
शनिवारी मुंबईत १हजार ४४७ रुग्ण नव्याने आढळले असून २४,८९६ चाचण्या केल्या गेल्या. शुक्रवारी मृत्यू झालेल्यांमध्ये दिर्घकालिन आजार आणि ६० वर्षापेक्षा जास्त वय अशांचा समावेश होता.
६२ रुग्णांपैकी ४१ रुग्णांना दीर्घकालीन आजार, तर ४४ रुग्ण हे ६० वर्षावरील होते. ४० ते ६० वयोगटातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४० वर्षाखालील पाच रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.