देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. दिल्लीत तर कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे.
गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे १७ हजार २८२ नवे रुग्ण आढळून आले. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १५.९२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १०४ इतकी आहे.
मास्क न लावल्यास कोरोना होण्याचा धोका
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. मात्र आता आलेली दुसरी लाट अधिक भीषण आहे.
आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण व्हायची. आता हेच प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
कोरोना फैलावण्याचा वेगदेखील वाढला आहे. मास्क न घालता कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. याआधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका असायचा. आता ही वेळ मिनिटावर आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा विषाणू अतिशय वेगाने हातपाय पसरत आहे. आधीच्या तुलनेत त्याच्या फैलावाचा वेग वाढला आहे. यापूर्वी परिस्थिती वेगळी होती.
एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी तिला कोरोना होण्याचा धोका होता. पण आता एका मिनिटातच कोरोनाची लागण होत आहे.
दिल्लीतील सर्वाधिक कोरोना रुग्ण ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. या वयोगटातली लोकसंख्या जास्त असल्याने आणि ते कामासाठी बाहेर पडत असल्याने रुग्णांमध्ये त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.