खासदार व आमदार निधीतून यंत्रसामुग्री खरेदीसाठी भरीव मदत करावी : देशमुख
लातूर : जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य विभागाने हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत.
यासोबतच ऑक्सिजन बेड, वेंटीलेटर सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून ठेवाव्यात असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.
येथील शासकीय विश्रामगृहात लातूर जिल्हा प्रशासन व विधान सभा सदस्या समवेत लातूर जिल्हा कोवीड आढावा बैठकीचे आयोजन आज दि.19 एप्रिल रोजी करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.
या बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थाचे अधिष्ठता सुधीर देशमुख यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोव्हीड आजारावरील परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व नागरीकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे अतिशय आवश्यक आहे. कोव्हीड साठी आजारावर आवश्यक असणारे रेमडिसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लँट, व्हॅटीलेटर मशीन, औषध व बेड बाबतची मागणी प्रशासनाकडे तात्काळ नोंदवावी.
खासदार व आमदार निधी तसेच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी भरीव मदत दिली जाईल. कोव्हीडच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी तात्काळ दिलेल्या सूचनांचा कृती आराखडा तयार करुन सादर करावा, अशाही सुचना पालकमंत्री देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.
राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी उदगीर तालुका व परिसरातील कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जम्बो सिलेंडर, बेड्स, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर मशीन तसेच औषधी मागणीप्रमाणे उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांना मदत करुन त्यांना दिलासा देऊ शकतो, असे म्हणाले. चाकूर, जळकोट, उदगीर या ठिकाणी मोठया प्रमाणात तपासणी व लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असे सांगितले.
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी ग्रामीण भागात सर्व सोयीने युक्त कोव्हीड सेंटरची जास्तीत जास्त गावांमध्ये उभारणी करुन रुग्णांना दिलासा द्यावा. सध्या स्थितीत वीज पुरवठा खंडीत करु नये.
खेड्यापाड्यातील जनतेला कोव्हीड सेंटर पर्यंत ये जा करण्यासाठी जास्त संख्येने ॲब्युलन्सची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ सेवा पुरविण्यासाठी जास्तीत जास्त ॲब्युलन्स उपलबध करुन द्याव्यात.
यावेळी आ.देशमुख यांनी ग्रामीण भागात उदभवणाऱ्या अडी-अडीचणीबाबत निवेदन पालकमंत्री देशमुख यांना देऊन मागणीप्रमाणे कोव्हीड सेंटर, यंत्र सामुग्री व ॲब्युलन्स उपलबध करुन देण्याची मागणी केली.
यावेळी आ.विक्रम काळे यांनी कोव्हीडच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या विविध समस्यावर प्रशासनाने समाधानकारक माहिती रुग्णांना द्यावी असे आवाहन केले.
या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कोव्हीडच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.