मुंबई : पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 5 डिसेंबरपर्यंत लॉगिनवरून आपला प्रवर्ग बदलावा लागणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राज्य सरकारने दिलेल्या एसईबीसी प्रवर्गाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
त्यामुळे यंदाची अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रिया महिनाभरापासून रखडलेली आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य सरकारने एसईबीसी प्रवर्गाला स्थगिती देत विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार प्रथम अकरावी, त्यानंतर आयटीआय आणि आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला अर्ज केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून अर्ज करावा लागणार आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 सप्टेंबर 2010 पूर्वीज्या विद्यार्थ्यांनी सीईबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज भरले आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून संधी देण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांनी खुल्या किंवा खुल्या दुर्बल घटक या प्रवर्गातंर्गत अर्ज रुपांतरित करायचा आहे. उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन 5 डिसेंबरपर्यंत आपला प्रवर्ग बदलायचा आहे. जे विद्यार्थी आपला प्रवर्ग बदलणार नाहीत.
त्यांना खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश देण्यात येईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र बंधनकारक
खुला प्रवर्ग निश्चित करणार्या विद्यार्थ्यांना केंद्रीभूत फेरीअंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेता येईल. मात्र त्यांना ईडब्ल्यूएस संवर्गाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवारांचा प्रवेश संस्थेद्वारे निश्चित करण्यात येणार नाही आणि विद्यार्थ्यांना आपला दावा गमवावा लागेल, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.