मुंबई : लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनला दुसरा पर्यायच नाही.
त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला होता.
कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून? या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्याने राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचे समजते
राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी सवांद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही महाराष्ट्रासाठी धिक्याची घंटा असल्याचे सांगितले होते.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
मला नियम पाळताना दृश्य स्वरूपात दिसलं नाही तर २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करणार, आता लावत नाही पण हा इशारा देतोय. तसेच मला दोन दिवसांत जर कोणतेही पर्याय नाही मिळाले तर दुर्दैवाने मला लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला होता.
राज्यातील आकडेवारी चिंताजनक
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे.
शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर २४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.
मुंबईत तर कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी झाली आहे. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोना रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.