जागतिक बँकेच्या (World Bank) 2017 च्या अहवालानुसार 2016 मध्ये देशातील जवळपास निम्म्या बचत खातेधारकांचे (Savings Account Holders) किमान एक बँक खाते निष्क्रिय (Dormant) असल्याचे सांगितले होते.
आपण अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती (Bank Accounts) उघडतो.
कधी नोकरीसाठी, कधी तर घराजवळ असलेली बँक, कधी सुविधा जास्त म्हणून तर कधी सुरक्षितता म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी एकापेक्षा जास्त बँक खाती उघडली जातात.
मात्र अशी अनेक खाती असतील, तर ती सांभाळताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अनेक खाती असल्याचे काही नुकसानही आहेत.
जागतिक बँकेच्या (World Bank) 2017 च्या अहवालानुसार 2016 मध्ये देशातील जवळपास निम्म्या बचत खातेधारकांचे (Savings Account Holders) किमान एक बँक खाते निष्क्रिय (Dormant) अवस्थेत होते, जगातले हे सर्वात जास्त प्रमाण होते.
मिनिमम बॅलन्सचा फटका
एका अभ्यासानुसार बहुतांश वेळा नोकरी बदलल्याने बहुतेक पगारदार लोकांचे (Salaried Persons) बँक खाते बदलले जाते.
याशिवाय गृह कर्ज खाते, डिमॅट खाते, वैयक्तिक बचत खाते अशी अनेक खाती उघडली जातात. अनेक बँक खाती असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला कमीत कमी शिल्लक (Minimum Balance) ठेवण्यासाठी इतक्या सगळ्या खात्यांमध्ये मिळून भरपूर पैसे ठेवावी लागते.
किमान शिल्लक नसेल तर दंड आकारला जातो. किमान शिल्लक रक्कमेचा दंड लागू नये म्हणून मिनिमम बॅलन्स ठेवतो, त्यामुळे जास्ती रक्कम खात्यात अडकून पडले.
आपण या रकमेचा काहीही वापर करू शकत नाही. कारण काहीही कारणाने ती काढली, तर शिल्लक कमी झाल्याने दंड बसतो. बर्याच बँकांमध्ये किमान शिल्लक 5 ते 10 हजार रुपये ठेवणे बंधनकारक असते, अशाप्रकारे आपले 25 ते 50 हजार रुपये हे अडकून पडतात.
परताव्याचे नुकसान
आपण खात्यात किमान शिल्लक ठेवली तर त्यावर वार्षिक 3 ते 3.5 टक्के व्याज मिळतं, पण हेच पैसे आपण म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा मुदत ठेवीमध्ये गुंतवत असाल तर अधिक परतावा (Return) मिळेल.
या व्यतिरिक्त प्रत्येक बँक डेबिट कार्ड (Debit Card) शुल्कासह इतर काही प्रकारचे शुल्क आकारते. तुम्ही कार्ड वापरता की नाही याचा बँकेला काही फरक पडत नाही. यामुळेही आपले नुकसान होते.
खाती डॉरमंट होण्याची शक्यता
नोकरीसाठी कंपनी किंवा ऑफिस जी पगारासाठीची खाती उघडते ती शून्य शिल्लक पगाराची खाती ( Zero Balance Salary Accounts) असतात.
नोकरी सोडल्यानंतर तीन महिन्यांनंतर पगार येत नसेल तर ते शून्य शिल्लक खातं सर्वसामान्य बचत खात्यात रूपांतरित होते. त्यामुळे त्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक ठरते.
एखादे खाते दोन वर्षांसाठी वापरले गेले नाही, त्यात कोणतेही व्यवहार झाले नाहीत, तर ते खाते डॉरमंट (Dormant) होते. या खात्याद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही.
डेबिट कार्ड, चेक, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग काहीही सुविधा वापरता येणार नाही असे खातं पुन्हा सुरू करायचे असेल तर बँकेकडे अर्ज करावा लागेल. खाते संयुक्त असेल तर दुसर्या व्यक्तीची मान्यताही घ्यावी लागेल.
कर भरताना व्याज मोजणी अवघड
आपल्याकडे अनेक बँक खाती असल्यास कर भरतानाही ( Tax Payment) त्रास होईल. 10 हजारांपर्यंत व्याज उत्पन्न करमुक्त आहे. त्यापेक्षा अधिक उत्पन्नावर कर आकारला जातो.
एका पेक्षा अधिक खाती असल्यास व्याज उत्पन्न मोजणं कठीण होऊ शकते. अर्थात यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी काळात परताव्याच्या फॉर्ममधील अन्य उत्पन्नाची माहिती आधीच भरलेली असेल, असे म्हटले आहे. आपले बँक खाते पॅनशी (Pan card) जोडलेले आहे. त्याच पॅन नंबरच्या मदतीने आयकर विभाग (Income Tax Department) आपल्या कमाईची सर्व माहिती घेईल.
पासवर्ड्स लक्षात ठेवणे सोपे
डिजिटल बँकिंग फसवणुकीची (Digital Banking Frauds) प्रकरणे बरीच वाढली आहेत. त्यामुळं बँका सतत आपली सिक्युरिटी फीचर्स (Security Features) आणि तंत्रज्ञान बदलत असतात.
तसेच वेळोवेळी पासवर्ड (Passwords) बदलण्याचा सल्लाही दिला जातो. अनेक बँक खाती असल्यामुळे आपल्याला या प्रत्येक बँक खात्याशी संबधित पासवर्ड नेहमी बदलणे आणि लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पासवर्ड्स लक्षात राहत नसतील, तर ते डायरी किंवा फोनमध्ये नोंदवून ठेवण्याचा पर्याय वापरला जातो, पण डायरी नेहमीच बरोबर ठेवता येते असे नाही आणि फोनमध्ये पासवर्ड ठेवणं सुरक्षित नसते.
कर सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ यांच्या मते, प्रत्येकाने एक ते दोन बँक खाती ठेवावीत. एक आपले पगाराचे खाते असेल, तर दुसरे आपले वैयक्तिक बचत खाते असेल.
पगारासाठीच्या खात्याकरता सर्व सेवा विनामूल्य असतात, तर बचत खात्याच्या मदतीने आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकता. कमी खाती असल्यानं आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे जाईल, किमान शिल्लक ठेवण्याचा भार कमी होईल, कर भरताना व्याजाचा हिशेब करणेही सोपे होईल.