दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीला ही ते हजेरी लावणार आहेत.
मुंबई : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनात पंजाबमधील प्रमुख पक्ष अकाली दलाचा मोठा सहभाग आहे. दरम्यान या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी अकाली दलाने जंग जंग पछाडले आहे.
हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली. शेतकरी आंदोलनादरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असेल.
दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीला ही ते हजेरी लावणार आहेत. असे अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले.
शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत.
शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर शिवसेना वर्षभरापूर्वी एनडीएतून बाहेर पडली.
मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करताना शिरोमणी अकाली दलाने काही महिन्यांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.