मुंबई: कोरोनाचे बरेच रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर्स म्हणून फिरत मोकाट असतात. परिणामी, अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशन बंद केले आहे. त्या 18 जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 18 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली.
होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथे रुग्ण ठेवले जातील. कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये सुपर स्प्रेडर्स बनून बाहेर पडण्याऱ्याना रोखले जाईल, असे टोपे म्हणाले.
‘या’ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद
अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, नागपूर
होम आयसोलेशन का बंदी घालावी लागली?
राज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना होम आयसोलेशन ठेवण्यात आले होते. तथापि, अनेक रुग्णांच्या हातावर होम आयसोलेशन शिक्का असूनही ते घराबाहेर फिरत असल्याचे आढळले आहे.
त्यांच्यामुळे बर्याच लोकांना संक्रमण देखील झालेले दिसून आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनाही धोका असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, हजारो लोकांच्या घरात शौचालय नाही, बरेच लोक एकाच खोलीत राहत आहेत.
या सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशन करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल. (Home isolation closed in 18 districts of the state)