मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.
शिक्षण विभागातर्फे कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून आता ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या आहेत.
आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. परीक्षांच्या ढोबळ तारखा गायकवाड यांनी जाहीर केल्या आहेत.
त्यानुसार १५ एप्रिलनंतर बारावीची लेखी परीक्षा तर ३ मे नंतर दहावीची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून नववी ते बारावीचे वर्ग राज्यातील बहुतेक ठिकाणी सुरू झाले आहेत.
त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.