शिक्षकांना ‘पैठणी’ सोबत किचेन ‘गॅरंटी’! निवडणुकीत भन्नाट ‘स्पेशल ऑफर’

175

महाविकास आघाडी सरकार चार-सहा महिने, वर्षभर टिकते की नाही अशी चर्चा असताना वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार पंचवीस वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त करून भाजपची चिंता वाढविली आहे.

तसाही गुरुवारचा दिवस भाजपसाठी चांगला नव्हता. विधान परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. नागपूर, पुण्याचा गड खालसा होत असतानाच सायंकाळच्या कार्यक्रमात पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोंड भरून स्तुती करताना मुख्यमंत्री अबोल असले तरी ‘चतुर’ आहेत, असे कोड कौतुक केले.

भाजप-शिवसेना युतीची सत्ता असताना पवारांनी उद्धव यांच्याविषयी केलेली विधाने तपासली तर आता त्यांना उद्धव यांच्यात चांगले ‘नेतृत्वगुण’ दिसत असल्याचे जाणवतेय हा मोठा बदल आहे. तरीही २५ वर्षांची सत्तेची ‘भाडेचिट्ठी’ जरा जास्तच वाटते.

‘कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत २४ जिल्ह्यांमध्ये भाजपची धुळधाण झाली, महाविकास आघाडीची ही महाराष्ट्र एक्स्प्रेस आहे, असं ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधान परिषद निकालावर केलंय. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही जनता गाडी आहे. लहान लहान गावांमध्ये थांबते, सगळ्यांना घेऊन चालते; पण वेळही खूप घेते.

याच कार्यक्रमात पवार म्हणतात त्याप्रमाणे आघाडीचे सरकार राहीलही; पण त्यातील मित्रपक्ष तेच राहतील का? आज हे सरकार अधिकाधिक स्थिर होतेय हे नक्की. त्यामुळेच मंत्रालयातून हद्दपार झालेले काही ‘पॉवर ब्रोकर्स’ दुपारच्या वेळी ट्रायडंट, ओबेरॉयमध्ये बसून सध्यातरी जळफळाट करत आहेत.

वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी रंगत आणली. काँग्रेसचे मंत्री काही त्रास देत नाहीत ना, असं सोनियाजी मला फोनवरून विचारतात, असे रहस्योद्घाटन त्यांनी केलं. त्यांनी पडद्याआडून त्रास देणाऱ्या काँग्रेस मंत्र्यांची हवाचं काढली. काँग्रेसच्या मंत्र्यांचा त्रास आहे; पण वरून मला आशीर्वाद आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली.

विधान परिषदेच्या यशानंतर सरकारची गती वाढावी आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसनं ‘वेग’ पकडावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

गुरुजी तुम्ही सुद्धा, पैठणी घेतली!

विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची चर्चा वेगळ्या अर्थाने रंगली. एका उमेदवारानं गुरुजनांना आशेचा किरण दाखवला. त्याची माणसं म्हणे मतदार असलेल्या गुरुजींचं घर गाठत आणि गुरुजींच्या पत्नीला ताई-ताई म्हणत दिवाळीचं गिफ्ट म्हणून एक पैठणी व हजार रुपये देत होते.

या शिवाय, एक किचेन दिलं जायचं. किचेन घ्या आणि आमचे उमेदवार जिंकले की किचेन परत आणा व पाच हजार रुपये घेऊन जा, अशी ‘स्पेशल ऑफर’ होती. काही उमेदवारांनी शंभर-दोनशे शिक्षकांची मतं हातात असलेल्या ‘शिक्षक नेत्यांना’ बंडलं व सर्व प्रकारची ‘सोय’ उपलब्ध करून दिल्याची चर्चा आहे. गुरुजींच्या निवडणुकीत पैसा चालला असेल तर ते गंभीरच आहे. हा नवाच ‘वेतन’ आयोग दिसतो.

भाजपचे असे ‘एकनिष्ठ’ नेते

अमरावती शिक्षक मतदारसंघात एक अपक्ष महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यांचे बंधू भाजपचे नेते असून, माजी मंत्री आहेत. त्यांनी व्हिडिओ जारी केला की, माझा पाठिंबा भाजपच्याच उमेदवाराला आहे; पण ते बहिणीसाठी छुपा प्रचार करीत असल्याच्या तक्रारी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या नेत्यांकडे अमरावतीतील काही भाजप नेत्यांनी केल्या आहेत.

नंदुरबार-धुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात तर गंमत होती. काँग्रेसच्या तेथील उमेदवाराचे वडील हे शहाद्याचे नगराध्यक्ष असून, ते भाजपचे आहेत. त्यांच्याही बाबत तक्रारी आहेत.

पुण्यातील एक-दोन बड्या भाजप नेत्यांनी पक्षाला ठेंगा दाखवला अशी चर्चा आहे. तिकीट वाटपापासून भाजपमध्ये गोंधळ होता. आत्मचिंतनाला भरपूर वाव आहे. नागपुरात बसलेला धक्का तर दीर्घकाळ जाणवत राहील.

शिक्षक संघटना हद्दपार!

शिक्षक मतदारसंघांमध्ये शिक्षक संघटनांचे उमेदवार लढत आणि संबंधित राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देत. या निवडणुकीत नवीन ट्रेंड दिसला. पुण्यात काँग्रेसचे उमेदवार जिंकले. पूर्वी तिथे शिक्षक संघटना जिंकायच्या.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं लढायचं आणि भाजपनं पाठिंबा द्यायचा हे वर्षानुवर्षांचं सूत्र अमरावतीत मोडित निघालं. त्याचा फटका दोघांनाही बसला. शिक्षक संघटनांना राजकीय पक्ष हद्दपार करायला निघाले, असा त्याचा अर्थ आहे.

संघटनेचा उमेदवार निवडून आला तर त्याला राजकीय पक्षाचा व्हिप लागू होत नाही. दुसरे म्हणजे तो शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रसंगी स्वत:च्या सरकारविरुद्धच सभागृहात आणि बाहेरही भूमिका घेतो. कोणत्याही राजकीय पक्षाला ते आवडत नाही. म्हणून आता राजकीय पक्षच या मतदारसंघांवर कब्जा करताहेत. शिक्षक संघटनांनी बोध घेण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here