महाष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. तरीही कोरोना नियंत्रणात येत नसल्याने सर्वांची काळजी वाढली आहे.
या संकटात काळजी वाढविणारी धक्कादायक माहिती आरोग्य तज्ज्ञांनी राज्यातील नागरिकांना दिली आहे. राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार होते. मात्र कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार नाही.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात लस नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. लसींच्या कमतरतेमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात आज 63 हजार 309 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर नव्या 61 हजार 181 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 30 हजार 729 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.4% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.