मुंबई : कोरोना विषाणूची (Corona Pandemic) साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सरकारने राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत तशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असेसुद्धा राज्य सरकारने म्हटले आहे.
कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) तसेच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्याने1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.
या तरतुदी विचारात घऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये
विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या विभागाच्या आयुक्तांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कवायती, संचलनावर बंदी
तसेच या नियोजित ठाकाणी ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर तसेच नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांनीच उपस्थित राहावे. तसेच ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.
तसेच इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच तसेच कवायती, संचलन आयोजन करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विधीमंडळ, उच्च न्यायालय इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांनी व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचन देण्यात आल्या आहेत.