Maharashtra Lockdown Update : राज्यात ‘पुन्हा’ लॉकडाऊनची दाट शक्यता? लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे : मुख्यमंत्री

422

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक आज पार पडली. 

या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चा झाल्याचे समोर येत आहे. कोरोना संक्रमण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णांसाठी बेड्स, अन्य आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे  दिसून येत आहे. अशावेळी टास्क फोर्सची महत्वाची बैठक आज पार पडली.

राज्यात निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

बैठकीतील महत्वाचे निर्णय

  • मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
  • प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
  • विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
  • सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.
  • ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.
  • गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा.
  • मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती

सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटापैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या आहेत. उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. 60 हजार 349 ऑक्सिजन खाटापैकी 12 हजार 701 खाटा , 19 हजार 930 खाटापैकी 7 हजार 342 खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. 9 हजार 30 व्हेंटीलेटर्सपैकी 1 हजार 881च्या वर रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडत आहे.

लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र, अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही.

विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. तसंच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचं पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे.

त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल, असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

 

बेड्स, व्हेंटीलेटरची संख्या कमी!  

या बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक गंभीर बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली. राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं व्यास यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here