ममतांचा शरद पवारांना मदतीसाठी फोन | यूपीए अध्यक्षाच्या भूमिकेत शरद पवार?

238
sharad pawar mamta banerjee

यूपीएमधील महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यामुळे UPA अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत पवारांची भूमिका महत्त्वाची आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील, अशी चर्चा 8-10 दिवसापूर्वी सुरु होती. ही चर्चा शरद पवारांच्या स्पष्टीकरणाने थांबली होती.

पुन्हा ममता बॅनर्जींच्या फोनमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. शरद पवारांनी जर ममतांची साद स्वीकारली तर देशाच्या राजकारणात चमत्कार घडू शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणत असले तरी नेमक्या वेळी शिकार करण्यात पवारांना महारत आहे.

सध्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं आहे. कारण भाजपाने पूर्ण बंगाल ढवळून काढला आहे. फोडाफोडी करून तृणमूल कॉंग्रेस खिळखिळी केली आहे. त्यामुळे ममतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला वाचविण्यासाठी शरद पवारांना साद दिली आहे.

शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत, आवश्यकता वाटल्यास पश्चिम बंगालकडे कूच करण्याचं जाहीर केलं. त्यामुळे पवार नक्की कोणता चमत्कार करतात याची उत्सुकता सर्वांना आहे.

या सर्व पार्श्वभूमीमुळे पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचं अध्यक्षपद चर्चेत आलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या 2004 पासून ते आजपर्यंत यूपीएच्या अध्यक्ष आहेत.

मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद आधीच सोडलं आहे. त्यानंतर आता यूपीएच्या अध्यक्षपदासाठीही चाचपणी सुरु आहे.

सध्याच्या बिकट परिस्थितीत छोट्या-मोठ्या पक्षांची मिळून बनलेली आघाडी अर्थात यूपीएचं नेतृत्त्व कोण करु शकतो, असा प्रश्न विचारला जात आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांनी शरद पवार असं दिलं आहे.

शरद पवारांनी आपला सुप्त हेतू उघड न करता तूर्तास तरी आपण यूपीएचं प्रमुखपद स्वीकारण्याबाबतच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे.

मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि शरद पवारांचा सर्वपक्षीय संबंध, त्यांचा अनुभव पाहता, यूपीएच्या अध्यक्षपदाच्या निवडीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

मलिकांचा दावा 

नुकतंच नवाब मलिक यांनी शरद पवार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार असल्याचं म्हटले आहे.

“भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्यसरकारचा विषय आहे.

केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून याविषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि पवारसाहेब यांची चर्चा झाली आहे.

भाजपाला रोखण्यासाठी गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये पवारसाहेब जातील” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अध्यक्षपदाच्या निवडीत पवारांची भूमिका महत्त्वाची का?

ममतांनी शरद पवारांना मदतीसाठी साद घालणं, यावरुन शरद पवारांचे मित्रपक्षाशी असलेले संबंध आणि त्यांचं राजकीय कसब लक्षात येतं. यावरुनच अध्यक्षपदाच्या निवडीत पवारांची भूमिका महत्त्वाची का आहे, हे दिसून येत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, “शरद पवार हे देशातील महत्वाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. यूपीएतील घटक पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. केवळ सलोख्याचे संबंधच नव्हे तर त्यांच्या शब्दाला मान आहे. अनुभवातून आलेलं मार्गदर्शन हे यूपीएची मोट बांधण्यासाठी आवश्यक आहे”.

यूपीएच्या पुनर्बांधणीत पवारांची भूमिका

शरद पवारांचं हेच कसब राष्ट्रीय राजकारणात आवश्यक असल्याचं मत, यूपीएतील घटक पक्ष बोलून दाखवत आहेत. सध्या मोदी-शाहांचा विजयी वारु रोखण्यासाठई यूपीएची पुनर्बांधणी आवश्यक आहे.

घटक पक्षातील क्षमता आणि मर्यादा ओळखून भाजपला कसं रोखायचं याचं नियोजन पवारच करु शकतात, असा विश्वास यूपीएतील पक्षांना आहे.

यूपीएची निर्मिती

यूपीएच्या घटक पक्षांमध्ये देशभरातील अनेक राजकीय पक्षांचा समावेश आहे. प्रामुख्याने काँग्रेसच्या नेतृत्त्वात मित्रपक्षांची मिळून संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA ची निर्मिती झाली.

2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यावेळी भाजपप्रणित NDA ला रोखण्यासाठी UPA ची मोट आणखी मजबूत करण्यात आली.

यूपीएने 2004 आणि 2009 मध्ये देशात सत्ता स्थापन केली. UPA 1 आणि UPA 2 च्या सत्ताकाळात मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानपद भूषवलं.

यूपीएमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील प्रमुख दोन पक्ष आहेत. दक्षिणेकडील पक्ष ही यूपीएची ताकद आहे. तामिळनाडूतील द्रमुक, अण्णा द्रमुक, बिहारमधील राजद, केरळ आणि तामिळनाडूतील भारतीय मुस्लिम लीग प्रभावी आहे.

जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा, केरळमधील क्रांतिकारी समाजवादी पार्टी, आसाममधील डेमोक्रॅटिक फ्रंट प्रादेशिक अस्तित्व टिकवून आहेत.

उत्तर प्रदेशातील सपा-बसपा, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस असे अनेक मातब्बर पक्ष व नेते यूपीएमध्ये आहेत. काहींनी UPA ची साथ सोडली तर काही अद्याप यूपीएसोबत आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला

शरद पवारांनी भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केली. सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजप महाराष्ट्रात सत्तेपासून दूर राहिला. अशक्य असणारी गोष्ट शरद पवारांनी शक्य करुन दाखवली.

शरद पवारांनी टोकाचा आणि भिन्न विचार असलेल्या शिवसेनेशी जुळवून घेतलं. कधीही जवळ न येणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणलं आणि महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं.

पवारांचे कुणाकुणाशी सलोख्याचे संबंध?

शरद पवारांचे यूपीएतील बहुतेक सर्व पक्षाशी सलोख्याचे संबंध आहेत.  ममता बॅनर्जी संकटसमयी पवारांना कॉल करतात, त्यावरुन त्यांच्या सलोख्याची कल्पना येऊ शकते.

याशिवाय समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव, RJD चे लालू यादव, जम्मू काश्मीरमधील अब्दुल्ला पिता-पुत्र, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, NDA तून बाहेर पडलेले प्रकाशसिंह बादल अशा दिग्गजांशी पवारांचे सलोख्याचे संबंध आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here