मोदी सरकार म्हणजे पाकिटमार | लोकांचे पाकीट मारणारे सरकार आहे : नवाब मलिक

306
Nawab Malik

मुंबई : सध्याचे मोदी सरकार लोकांचे खिसे मारणारे सरकार आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे दररोज खिसे कापत असून हे ‘पाकिटमार सरकार’ बनले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. 

देशात निवडणुका होत्या तेव्हा भाव वाढ केली नाही, मात्र निवडणुका संपताच दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे (Petrol and diesel rates) दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. 

जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने लोकांची लूट थांबवावी. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असले पाहिजे, असेही मलिक यांनी म्हटले.

नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही

देशात कोरोना संसर्गाचा हाहाकार उडाल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.
भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे.  जितके पैसे जाहिरातीवर खर्च करण्यात येत आहे. तेवढा पैसा कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता, असा टोला मलिक यांनी केंद्राला लगावला आहे.

कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here