राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे.
राज्य शासन ‘श्रीमंत’ मराठा समाज व नेत्यांना बळी पडत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
वंचित बहुजन आघाडी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवला पाहिजे व परीक्षा घेतल्या पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अजब सरकार की गजब कहाणी : सुधीर मुनगंटीवार
जगातील सर्वाधिक संभ्रमी सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेणारे आहे. विद्यार्थ्यांच्या मनात मेहनतीबाबत प्रश्नचिन्ह आहे. सरकार वयोमर्यादा वाढवण्याबाबत काही निर्णय घेत नाही.
आरोग्य विभागाबाबत नोकरभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. कोरोनाविषयी सावधानता पाळली पाहिजे. पोहरादेवीवर हजारो लोक एकत्र येतात तिथं नाममात्र एफआयआर दाखल केला. मंत्र्यांनी कोरोना काळात मोर्चा काढण्यात आला.
परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करता, परीक्षा घेत नाही, घुमजाव करता. खुल्या प्रवर्गाला 6 संधी ठेवता. ओबीसीसाठी संधीची मर्यादा ठेवता.
लोकसेवा आयोगाचे सदस्य नेमत नाही. सदस्य नेमण्याची फाईल आत्महत्या करेल. महाराष्ट्राच्या सरकारपुढं मोहन डेलकर हा एवढाच विषय आहे, असे टीकास्त्र सोडलं आहे.
हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक: चंद्रकांत पाटील
MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे. या सरकार मध्ये जरा देखील समन्वय आढळून येत नाही त्यामुळेच ही गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे.
प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी २ ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो.त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे.
MPSC सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मी मागणी करतो, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे सरकार गोंधळलेलं सरकार : गोपीचंद पडळकर
यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात. 14 तारखेला होणारी परीक्षा झाली पाहिजे. एमपीएससी परीक्षेमध्ये राजकारण करु नका, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. हे गोंधळलेले सरकार आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
निर्णयावर तातडीनं फेरविचार करावा: सत्यजीत तांबे
काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करतो, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
अचनाकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे, असा सवाल तांबे यांनी केला. त्या निर्णयावर तातडीनं फेरविचार करा, असं आवाहन तांबे यांनी केलं आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या परीक्षा 21 मार्चला होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
MPSC विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील 8 ते 10 दिवसांत होण्याची शक्यता असून 21 मार्चला परीक्षा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार परीक्षा घेण्याच्या तयारीत, असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमपीएससी परीक्षांबाबत मोठ निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं गांभीर्यानं दखल घेतली आहे.