राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता वाझे प्रकरणात उडी घेतली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडेलल्या स्फोटकांवरुन राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर घडामोडींचा समाचार घेताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“व्यवहार माझे, जबाबदार वाझे!, सांगा पाहू कोणकोणास म्हणाले”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
अमृता फडणवीसांच्या ट्विटवरुन आता अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबत त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत सोशल मीडियात जोरदार चर्चा केली जात आहे.
अमृता फडणवीस सोशल मीडियात चांगल्या सक्रिय असतात. त्यांचा राजकारणाशी तसा थेट संबंध नसला तरी विविध विषयांवरुन त्या राज्य सरकारवर टीका करत असतात.
त्यांनी केलेल्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा देखील होते. काही दिवसांपूर्वी, अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून कोविड काळात राज्य सरकारकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
“एका बाजूला नागपुरात कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात जागा नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटर्समध्ये भ्रष्टाचार करत आहे.
तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत”, असं ट्विट केले होते.