Myanmar Crisis : म्यानमारमधील यादवीचे परिणाम भारतात शरणार्थींच्या रुपात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे अगोदरच मणिपूर सरकारने शरणार्थींसाठी मदत शिबीरे उघडू नयेत तसेच त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करू नयेत असे आदेश सीमाभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
भारता शेजारील राष्ट्र म्यानमारमध्ये सुरू असलेले राजकीय आणि सैन्य संकट भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचले आहे. या यादवी आडुन भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता पाहून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
म्यानमारमधील यादवीमुळे तिथले नागरिक भारतात शरणार्थी म्हणून घुसण्याचा प्रयत्न करू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी सीमाभागातील जिल्ह्यांना घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याचे निर्देश लागू केले आहेत.
म्यानमारच्या शरणार्थींना सीमेत घुसू देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. शरणार्थींसाठी मदत शिबीरे उघडू नयेत तसंच त्यांच्या निवास व जेवणचीही व्यवस्था करू नये. म्यानमारचे नागरिक शरण मागण्यासाठी आलेच तर त्यांना हात जोडून परत पाठवण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, म्यानमारशी निगडीत भारताची सीमा जवळपास १६४३ किलोमीटर लांब आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या तख्तपालटानंतर सैन्य शासकांविरुद्ध जनतेमध्ये तीव्र असंतोष दिसून येतोय. यातच ४०० हून अधिक जणांचा जीवही गेलाय.
मणिपूर सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, स्थानिक प्रशासन किंवा सिव्हिल सोसायटी म्यानमारहून येणाऱ्या शराणार्थींना आसरा किंवा भोजन देऊ शकणार नाहीत.
आदेशानुसार, फक्त मानवीय आधारावर अतिशय गंभीर जखमी परिस्थितीतच वैद्यकीय मदत दिली जाऊ शकते. मणिपूर प्रशासनाने हे आदेश चंदेल, टेंगनोउपल, केमजोंग, उखरुल आणि चूडाचंदपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी जारी केले आहेत.
सोबतच ‘म्यानमानरच्या नागरिकांच्या अवैध घुसखोरी’ संदर्भात योग्य ते पाऊले उचलण्यात यावेत, असेही स्पष्ट आदेश दिले आहेत.
म्यानमानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीचा परिणाम म्हणून मोठ्या संख्येत शरणार्थी भारतात घुसखोरी करण्याची शक्यता आहे. स्थानिक देखरेख समूह Assistance Association for Political Prisoners (AAPP) च्या माहितीनुसार, म्यानमारवर कब्जा मिळवणाऱ्या सैन्य शासकांनी यंगूनसहीत देशातील ८ भागांतील आंदोलनकर्त्यांवर शुक्रवारी गोळीबार केला.
यामध्ये जवळपास ९० जण मारले गेले आहेत. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. १ फेब्रुवारीपासून म्यानमारमध्ये आत्तापर्यंत ४२० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत.