जालना : ‘आता मुख्यमंत्री ओबीसींचा’चे फलक रविवारी जालना येथे (दि.२४) विशाल ओबीसी मोर्चात झळकले.
या प्रसंगी आता पुढचा मुख्यमंत्री ओबीसींचाच अशा घोषणाही देण्यात आल्या.
या घोषणाचा ‘राजकिय अर्थ’ काय लावायचा? याबाबत नव्याने राजकीय चर्चा ऐकायला मिळणार आहे.
या मोर्चात महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, खासदार विकास महात्मे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भागवत कराड, आमदार राजेश राठोड आदी नेत्यांनी मोर्चात सहभाग घेतला. तसेच यावेळी महिलांची संख्या दखल घ्यावी अशी होती.
या ओबीसी मोर्चात सुमारे एक लाखांपेक्षा अधिक समाज बांधव सहभागी झाले होते.
ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची २०२१ मध्ये जातीनिहाय जनगणना करावी.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असंवैधानिक नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी.
ओबीसी विद्यार्थ्यांना एससी., एस.टी., विद्यार्थ्यांप्रमाणे शंभर टक्के स्कॉलरशिप द्यावी.
राज्यातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये झालेल्या दोषपूर्ण बिंदू नामावलींची चौकशी करून नव्याने बिंदू नामावली तयार करावी.
मंडळ आयोग लागू होऊनही केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के प्रतिनिधित्व मिळाले नाही.
हा बॅकलॉग तत्काळ भरावा, ओबसी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोउन्नतीमध्ये आरक्षण मिळावे.
ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालूका स्तरावर निवासी वसतिगृहाची उभारणी करा.
महाज्योतीला दोन हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काद्राबाद, पाणीवेस, मस्तगड, गांधी चमन, टाऊनहॉल, शनिमंदिर चौक, उड्डाण पुल, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली येथे दाखल झाला.