लातूर : जिल्हयात या वर्षी खरीप हंगामातील सोयाबिन बियाणांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाल्याने कांही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले.
त्यामुळे काही बिजोत्पादन कंपन्यांवर कारवाई सुध्दा झाली आहे. परिणामी पुढील हंगामासाठी बिजोत्पादन कंपन्यामार्फत बियाणांचा पुरवठा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे कृषि विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घरगुती बियाणे तयार करण्याचे आवाहन करुन प्रशिक्षण सुध्दा दिले आहे. यातून पुढील खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे बाबत स्वयंपूर्ण होईल अशी आपेक्षा आहे.
तसेच सोयाबिन पिक काढणीच्या वेळेस पाऊस असल्यामुळे कांही क्षेत्रावरील सोयाबीन काढतेवेळी भिजलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी बियाणेच्या दर्जावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
त्यामूळे कृषि विभागाकडून उन्हाळी सोयाबीनचे पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करुन उत्तम प्रकारचे बियाणे तयार करण्याचे नियोजन केले आहे.
तरी उन्हाळी सोयाबीन पिक घेऊ इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालूका कृषि अधिकारी यांचे कार्यालय येथे अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा, लातूर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.