राज ठाकरेंचे उद्धव सरकारला १० प्रश्न | राज्यात निष्पक्ष तपास होईल याची खात्री नाही : राज ठाकरे

161
Raj Thackeray 10 questions to Uddhav govt

मुंबई : मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. 

त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित हाऊ लागले. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले. सोबतच केंद्राने यात हस्तक्षेप करुन कसून चौकशी करावी अशी मागणीही केली.

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्यास सांगितलं होते, असे परमबीर सिंग यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांनी या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केलेत. तसेच, त्यांनी अनेक सवालही यावेळी उपस्थित केलेत.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.

जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

ही घटना लज्जास्पद आहे, अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही. एक वर्षे झाले म्हणून १२०० कोटी द्यायला हवी असेल पण लॉकडाऊनमुळे बार बंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल.

राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिला हे अजून बाहेर आले नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरेंचे यांनी विचारलेले 10 प्रश्न 

  • पहिला प्रश्न : गाडीत जिलेटीन ठेवले पण ते जिलेटीन आले कुठून?
  • दुसरा प्रश्न : परमबीरसिंग यांना पदावरुन का हटवलं?
  • तिसरा प्रश्न : परमबीरसिंग दोषी होते तर मग त्यांना निलंबीत करुन चौकशी का नाही केली?
  • चौथा प्रश्न : शिवसेना पक्षात वाझेला कोण घेऊन गेलं होतं?
  • पाचवा प्रश्न : अंबानीच्या घराखाली वाझे कुणी सांगितल्याशिवाय गाडी ठेवेल का?
  • सहावा प्रश्न : बाँब ठेवण्याचं धाडस, कुणाचा तरी आदेश असल्याशिवाय पोलीस करतील का?
  • सातवा प्रश्न : नीता भाभी आणि मुकेश भैय्या? बाँबची धमकी देणारा आदर करतो का?
  • आठवा प्रश्न : अंबानींकडून पैसे काढणं सोपं आहे का?
  • नववा प्रश्न : बरं ज्या अंबानीचे मुख्यमंत्र्यांसोबत मधूर संबंध आहेत, तिथं पोलीस पैसे मागायला जातील का?
  • दहावा प्रश्न : कुणाच्या सांगण्यावरुन गाडी तिथं ठेवली गेली?

राज्यात निष्पक्ष तपास होईल याची खात्री नाही

जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे.

ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. कारण या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही.

जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली, तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ, असेही राज ठाकरे म्हणाले.

जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं?

बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होते, पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकले नव्हते किंवा पाहिले नव्हते. मुळात परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवले, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का केले नाही?

त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आले ह्याची उत्तरे अजून का मिळाली नाहीत? असेही राज ठाकरे म्हणाले.

त्यांच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकते का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

केंद्राने सखोल चौकशी करायला हवी

सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते.

सचिन वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, असेही राज ठाकरे म्हणाले

चौकशी व्यवस्थित होऊ द्या

सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here