मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत.
त्या घटनेशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे.
या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.
पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक बाबी नमूद केल्या आहेत. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत.
या प्रकरणात एकूण १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे.
या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत, याकडेही फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले आहे.
पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते आहे.
ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे.
ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूजा ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती.
-
भाऊ व मित्रासोबत ती वानवडीमधील हेवन पार्क या सोसायटीत राहायची. दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, यात विदर्भातील एका मंत्र्याचा कथित संबध पुढे येऊ लागल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
पूजाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात आज फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.