मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावरून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आंदोलनजीवी या शब्दावरून टीकेचे प्रहार केले आहेत.
भारतीय जनता पक्षाची आतापर्यंत झालेली सर्व आंदोलने मग राजकीय हितासाठी आणि सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल, असे नमूद करत काश्मिरातून ३७० कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली असून आणीबाणीपासून अयोध्या अंदोलन, महागाईपासून ते काश्मिरातील ३७० कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली, असे म्हणत रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले आणि बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता आंदोलनजीवी ठरवले गेले.
क्रांतीकारक सत्तेवर येताच सगळ्यात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो, असे सांगतानाच आपल्या देशात हेच सुरू आहे का?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलनांमुळेच मोदी, शहा दिल्लीच्या तख्तावर पोहोचले
राऊत पुढे म्हणतात की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे आज आंदोलनांची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्स्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले.
मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच गोध्राकांड आंदोलनाने मोदी आणि शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले.
संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे
पंतप्रधान मोदींवर टीका करताना राऊत यांनी राम मनोहर लोहिया यांचे एक विधान नमूद केले आहे. ज्या लोकशाहीतील रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, हे लोहिया यांचे बोल आज खरे होताना दिसत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. याचे कारण म्हणजे रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहेत.
गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा उभा केला गेला आहे. याच सरदार पटेल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह झाला, असे सांगत राऊत यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे आंदोलनजीवी होते असे दाखवून दिले आहेत.
कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा आंदोलनांच्या झेंड्याखाली गांधीजींनी देश एका झेंड्याखाली एकवटला. गांधीजींची उपोषणे हे सुद्धा आंदोलनच होते.
स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची ठिणगी टाकणारे फुलेच होते. त्यांचे आंदोलनही मग परजीवी म्हणायचे काय, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, पं. मोतीलाल नेहरू, देशबंधू चिंत्तरंजन दास, श्यामप्रसाद मुखर्जी हे सर्व नेत्यांनी आदोलनेच केल्याचे राऊत यांनी दाखवून दिले आहे.