अहमदनगर : अहमदनगर (ahamadnagar) शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तर,शेवगाव पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन टीममध्ये कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
गणपतीच्या काळामध्ये पोलीस अटक करणार अशी भीती दाखवून खोट्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसांनी आदित्य यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता.
शेवगाव पोलीस ठाण्याचे डिटेक्शन विभागात कार्यरत असलेल्या पोलिसांनी आदित्यला खोट्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 50 हजारांची मागणी केली होती.
त्यातील 48 हजार रुपये आदित्यच्या आईने बचत गटातून काढून दिले दोन हजार रुपये आदित्यने फोन पे केल्याची माहिती आईने दिली.
शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी सांगितले की, आदित्यला मोटरसायकल आणि एक गावठी कट्टा संदर्भामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी आणले होते.
मात्र आदित्य या घटनेमध्ये नसल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीनंतर सोडून दिले होते. मात्र, त्याला कोणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
या घटनेमुळे नातेवाईकांनी मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणला होता. मात्र, पोलिसांच्या आश्वासनामुळे मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईक घेऊन गेले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.