आरेमध्ये काम सुरु करा, आम्ही टीका करणार नाही | देवेंद्र फडणवीस

174
Devendra Fandvis-Udhavt thakre

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. या निर्णयानंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

मुख्यमंत्री महोदय इगो सोडा, आरेमध्ये काम सुरू करा, आम्ही टीका करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले की, मी कालच सभागृहात यावर बोललो होतो, केवळ इगो करता निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्री यांच्या निर्णयानेच मेट्रो मध्ये मिठाचा खडा पडला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, कंजूरमार्ग कार शेड जरी गेलं तरी आरेमध्ये काम करावंच लागणार आहे. कोणाच्या भरवशावर हे चाललं आहे? जनतेचे हे पैसे आहेत. राज्य सरकारने आरेमध्ये काम सुरू करावे, आम्ही कोणतीही टीका करणार नाही, असं ते म्हणाले.

अतिशय बेसिक मुद्दा आहे की समजा जर जमीन क्लियर असली तरी मेट्रो बांधायला 4 वर्ष उशीर होणार आहे. पण जमीन वादातीत आहे. राज्य सरकार हा अट्टाहास का करत आहे ? असा सवाल त्यांनी केला.

आपला इगो सोडा, सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे, मेट्रो वेळेत धावू लागेल. राज्य सरकारला अक्षरशः चपराक दिली आहे. मुख्यमंत्री यांना चुकीचे ब्रिफिंग केलेलं आहे.

विकासकामात राजकारण करत नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. कांजूरमार्ग मेट्रोशेडबाबतच्या कोर्टाच्या निर्णयाची बातमी ऐकली. त्यांना (विरोधकांना) जे करायचं ते त्यांनी केलं.

आता कायद्याच्या माध्यमातून काय सकारात्मक भूमिका घेता येईल याबाबत सरकार भूमिका घेईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले की, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सर्व अधिकारी तसेच संबंधितांशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांसह एकत्र बसून पुढील भूमिका ठरवली जाईल. काम सुरु करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील.

विकासकामात आम्ही कधीच राजकारण करत नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय केंद्र सरकारच्या फारच जिव्हारी लागलाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.

आम्ही घेतलेला निर्णय काही लोकांच्या जिव्हारी लागला. म्हणून केंद्र सरकारने असा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश

एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे.

तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

कांजूरमार्गच्या जागेचा नेमका वाद काय आहे?

आरेतील मेट्रो 3 चं कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय होताच केंद्र सरकारनंही कांजूरमार्गच्या या जागेवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला होता.

सदर जागा ही मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे असं नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा बोर्ड लावला होता.

दरम्यान एका बांधकाम व्यवसायिकानंही ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली आहे. तसा आमच्यात करार झाला.

सध्या एमएमआरडीएनं तिथं मेट्रो कारशेडसाठी जे खोदकाम सुरू केलं आहे ते तात्काळ थांबवावं असा उल्लेख असणारी नोटिसच महेशकुमार गरोडीया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांना पाठवली आहे.

गरोडीया ग्रुपचं म्हणणं आहे की, त्यांनी कांजूर गावात सुमारे 500 एकर जमीन भाडयानं घेतली आहे. त्यामध्ये मेट्रोकारशेडसाठी घेतलेल्या जमीनीचाहीचा समावेश आहे.

त्यामुळे मिलिंद बोरिकर यांनी जी 102 एकर जमीन एमएमआरडीएला देणारे आदेशपत्र दिले आहे ते तात्काळ रद्द करावे. यासांदर्भात गरोडिया यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला साल 2005 मध्ये हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

ज्यात हायकोर्टानं गरोडिया यांना तूर्तास दिलासा देत ‘त्या’ जमिनी संदर्भात अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांचा दावा कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे.

एमएमआरडीएची भूमिका

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन वरील ताण कमी करण्यासाठी मेट्रोचा प्रकल्प हा़ अत्यंत गरजेचा आहे. शहराच्या विविध भागात मेट्रोचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या कारशेड शिवाय मेट्रो चालवता येणार नाही.

कांजूरमार्ग कारशेडची जागा नेमकी कोणाच्या मालकीची हे अद्याप ठरणं बाकी असून लोकांचं हित लक्षात घेता कोर्टाने मेट्रोच्या कामाला स्थगिती देऊ नये असा युक्तिवाद एमएमआरडीएतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी केला.

तसेच मेट्रो 3 मध्ये केंद्र सरकारचे निम्मे शेअर्स असल्याचेही त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत ऑक्टोबर 2022 पर्यंत मेट्रोच्या कामाची डेडलाईन असल्याचंही कोर्टात सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here