पुणे : महाविकास आघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे.
लोकप्रतिनिधींची सुरक्षा काढून राज्य सरकारने जनतेच्या आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा कमी केल्याने सरकारचे आभार व्यक्त करतो. राज्यात कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिगडत चालली आहे.
मी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आम्ही दोघे राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठीक होत नाही.
महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही, असे पाटील यांनी प्रसिध्दीला निवेदनात म्हटले आहे.
ते म्हणाले की, आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलिस जवानांना वगळण्यात आलं आहे त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भिती निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे.
त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट रहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे.
पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारचे वाभाडे निघत असतात.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची ऊर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा करतो.
सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे. पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत.