चतरा : देशात कायद्याचे राज्य असतानाही अनेक ठिकाणी जात पंचायती, समाजातील इतर पंचायती अनेक घटनांमध्ये निवाडा करत असल्याचे व शिक्षा दिल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
दोन मुलांची आई असलेली महिला अविवाहित प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यांनी लग्नही केले. मात्र वर्षभराने गावात परतणे या जोडप्याला चांगलेच महागात पडले. गावात आल्यानंतर त्यांना पंचायतीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले.
प्रेमात आकंठ बुडालेली ही महिला आणि तिचा प्रियकर पळून गेल्यानंतर केवळ त्यांच्याच गावात नाही तर, आजूबाजूच्या अनेक गावात खळबळ उडाली होती. हे दोघे वर्षभराने गावात परत आल्यानंतर अधिकच तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.
येथील चार गावातील लोकांनी ताबडतोब पंचायत बोलावत या जोडप्याला शिक्षा सुनावली. झारखंडमध्ये (Jharkhand) हा प्रकार घडला आहे. चतरा जिल्ह्यातील सिमरिया येथील खिजुरियाटाड गावातील पंचायतीने या जोडप्याने गाव सोडून जाण्याचे फर्मान काढले.
मात्र, केवळ एवढ्या शिक्षेने गावातील लोकांचे समाधान झाले नाही. भडकलेल्या गावकऱ्यांनी आधी युवकाचे आणि नंतर त्या महिलेचे डोक्याचे केस कापून मुंडण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र इतक्याने काही लोकांचे समाधान झाले नाही. त्यांनी चिडून या जोडप्याचे डोक्याचे केस कापून त्यांचे मुंडण करण्याची आणि त्यांना चपलांचा हार घालून गावात त्यांची धिंड काढण्याची मागणी केली. तर महिला बबीता देवी हिचा पहिला पती विशेश्वर भुईया याने पंचायतीसमोरच पत्नीसोबत पळालेल्या तरुणाच्या वडिलांना बेदम मारहाण केली.
महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रकार केल्यामुळे तिचा पती भयंकर चिडलेला होता. या रागातूनच त्याने चक्क महिलेच्या प्रियकराच्या वडिलांना जबरदस्त मारहाण केली.
यानंतर या जोडप्याला गाव सोडून जाण्याचे फर्मान सुनावण्यात आले. खिजुरियाटाड गावचा रहिवासी असलेल्या राजेश भुईया याच्यासोबत गावातीलच विशेश्वर याची पत्नी बबिता देवी वर्षापूर्वी पळून गेली होती. ही महिला दोन मुलांची आई आहे.
त्यामुळे हा प्रकार कळल्यानंतर गावातील लोकांनी पळून गेलेल्या जोडप्याला बहिष्कृत केले. त्याचप्रमाणे पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी या दोघांना गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असा निर्णयही त्यांनी दिला.