नाशिक : शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी यूपीएच्या नेतृत्वाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीत.
त्यामुळे यूपीएचे नेतृत्व करण्यासाठी शरद पवार हे सक्षम व्यक्तिमत्व असल्याचे राऊत म्हणाले. राऊत हे आज नाशिकमध्ये होते. राऊत यांनी आज नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला.
सचिन वाझे प्रकरणावर बोलताना कुणीही आले आणि कोणत्याही प्रकरणाचा तपास केला तर सत्य समोर येईलच, असेही राऊत यांनी म्हटलंय.
पवारांची यूपीएचे नेतृत्व करावे
शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केले. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे.
आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केले. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीयेत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीयेत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व आहे, असे संजय राऊत म्हणाले.
महापालिका निवडणुकीसाठी सेनेची योजना
सकाळी सहा वाजता त्यांनी शपथ घेतली, हा मग घोडेबाजार नव्हता का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला केला. नाशिक शहराला नेमके काय हवेय? काय योजना राबवता येतील, यासाठी शिवसेनेची योजना तयार होतेय. याबाबत सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी ही माहिती मुख्यमंत्र्यांना देणार, असे संजय राऊत म्हणाले.
NIAला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती
संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणांवर भाष्य केलं. एनआयएला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या.
मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.
ममतांचा विजय निश्चित
देशाचं महाभारत हे पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे. मात्र, आम्ही सगळे ममता बॅनर्जी यांच्याकडून आहोत. भाजपच्या जागा वाढतील. मात्र, बहूमत हे फक्त ममता यांनाच मिळेल.
शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा विचार सुरु होता. मात्र, यावेळी ममता यांना पाठिंबा देणे योग्य असल्याचे शिवसेनेचे मत झाले. त्यामुळे शिवसेना बंगालमध्ये निवडणूक न लढता, ममता यांना पाठिंबा देणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
भाजपचे नेते हायकमांडला मुजरा करायला गेले असतील
दिल्लीत भाजपचे हायकमांड आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते हायकमांडला मुजरा करायला गेले असतील. त्यामुळे यात काही नवे नाही. उद्या उद्धव ठाकरे जर देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्हाला पण मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे लागेल.
मुंबई पोलीस दल हे सक्षम आहे. पोलीस समर्थ आहेत. मुंबई पोलिसांना सक्षम नवं नेतृत्व मिळालं आहे. अनिल देशमुख यांच्या बदलीचे सध्या चित्र दिसत नाहीये. शरद पवार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी कोरोनावर भाष्य केले. कोरोना राज्यभरात वाढत आहे. माझी शिवसेनेच्या नेत्य़ांशी, पालिकांच्या नेत्यांशीही चर्चा केली. नाशिकच्या कोरोनावाढीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. कारण राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रात सगळीकडे व्यवस्थित लसीकरण सुरु आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात लक्ष घालून आहेत.