सिंधुदुर्ग: तुम्ही टीव्हीवर दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्त्वात आहे, हे लोकांना कळते. अन्यथा आमच्या जिल्ह्यात कोणी सामना वाचतही नाही, अशी खोचक टीका गोपीनाथ पडळकर यांनी केली.
सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले.
गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले.
तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल घ्यायचे कारण नाही, असे सांगितले. सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो.
कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो?, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणं बरोबर नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
मनसेची भूमिका योग्य: पडळकर
गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेचे समर्थन केले. या सरकारला कुठल्याही विषयाचे गांभीर्य नाही. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. मनसेची भूमिका योग्य आहे.
कोरोना झाला म्हणून जर तुम्ही अधिवेशन टाळणार असाल तर महाराष्ट्राची जनता सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या महाविकास आघाडी सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
‘राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा’
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरुन ‘सामना’च्या अग्रलेखातून सोमवारी मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आले. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा.
त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील, असा टोला मोदी सरकारला लगावण्यात आला आहे. त्यावरही गोपीनाथ पडळकर यांनी १० रुपयावर जगणाऱ्यानी रामभक्तांना उपदेश करू नये असा सल्ला दिला आहे.